डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (२२ सप्टेंबर, इ.स. १८८७; कुंभोज, महाराष्ट्र - ९ मे, इ.स. १९५९) हे मराठीसमाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब वर्गांमध्ये शिक्षणप्रसार करण्यासाठी 'कमवा व शिका' हे तत्त्व स्वीकारून मोठी भूमिका पार पाडली. ते जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचेमहत्त्वाचे सदस्य होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग घेतला होता.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला.सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. लहानपणापासूनच भाऊराव बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.